
रत्नागिरीत स्थायी लोकअदालतीची स्थापना
रत्नागिरी : सार्वजनिक उपयोगिता सेवाअंतर्गत उद्भवलेले सुमारे १ कोटी रुपयांपर्यंतचे दावे विनाशुल्क निकाली काढण्यासाठी स्थायी लोकअदालतीची स्थापना करण्यात आली आहे. स्थायी लोकअदालतीची सुरवात राज्य विधीसेवा प्राधिकरणाद्वारे करण्यात आली आहे.
या अदालतीमध्ये रस्ते, जल व हवाई वाहतूक सेवा, टपाल, दूरध्वनी, विद्युत, पाणी, स्वच्छता, रुग्णालय, औषधी वितरण, विमा, शिक्षण, घर व स्थावर मालमत्ता, बॅंक, वित्तीय संस्था, रोजगार हमी, एलपीजी गॅसपुरवठा, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, वृद्धापकाळातील निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, बेरोजगार भत्ता आदी सेवांसदर्भातील वाद निकाली काढले जातात. या अदालतीमध्ये फियार्दीला केवळ साध्या कागदावर अर्ज करून दाद मागता येते. फिर्यादीला वकिलामार्फत किंवा स्वतः आपली बाजू मांडण्याची सुविधा आहे. यासाठी कोणतीही स्टँप, कोर्टशुल्क किंवा इतर शुल्क आकारण्यात येत नसून, निकालपत्राची प्रतही मोफत देण्यात येते.