
शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा; व्यापारी महासंघाची मागणी
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवरून वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. याचा परिणाम येथील व्यापारावर होत असल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. येत्या काही दिवसात गणपती सारखा मोठा सण देखील येऊन ठेपला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करणारे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे सदस्य पराग पानवलकर, व्यापारी महासंघाचे सल्लागार हेमंत वणजु, पदाधिकारी अमोल डोंगरे उपस्थित होते. खराब रस्त्यांमुळे व्यापारावर होणाऱ्या परिणामाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. खड्डे तात्पुरते डबर च्या साह्याने न बुजवता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पावसाचा जोर कमी होताच शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होईल असे आश्वासन प्रशासनाकडून यावेळी देण्यात आले.