
एसटी महामंडळाला मालवाहतुकीतून १० कोटीचे उत्पन्न
रत्नागिरी: कोरोना काळात परिवहन महामंडळाने हापूस आंबा वाहतुकीसाठी माल वाहतूक सेवा सुरू केली होती. त्यानंतर मालवाहतुकीमुळे एसटीला उत्पन्नाचा आधार मिळाला आहे. गेल्या चार वर्षात रत्नागिरी विभागाला १० कोटी २३ लाख १३ हजार ५७० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. माल वाहतूक करणाऱ्या अन्य वाहनांपेक्षा एसटीचे माल वाहतुकीचे दर कमी आहेत. त्याचबरोबर विश्वासार्हता, सुरक्षितता यामुळे वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
माल वाहतुकीसाठी कंपन्यांकडून एसटीकडे थेट संपर्क साधला जात आहे. कोरोना काळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन संपल्यानंतर पाच महिन्यानंतर माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्या पाच महिन्यात एसटीच्या माल वाहतुकीवर परिणाम झाला होता. अन्य दिवसात माल वाहतुकीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी विभागाकडे ५० माल वाहतूक ट्रक असून त्या द्वारे माल वाहतूक सुरू आहे. आंबापेटीपासून मालवाहतूक सुरू झाली. त्यानंतर सिमेंट, साखर, कौले, जांभा दगड, विटा, आंबा, काजू नारळ, सुपारी कलमे, पत्रे, पाईप, तांदूळ, गहू यांसारख्या विविध वस्तूंची वाहतूक करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, नांदेड, परभणी, पुणे, जळगाव, जालना या जिल्ह्यांतून एसटीची माल वाहतूक सुरू आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाउन काळात २०२० मध्ये आंबापेटी वाहतुकीसाठी माल वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ही सेवा नियमित सुरू ठेवण्यात आली. कमी दर, सुरक्षित वाहतूक विश्वासार्हता यामुळे माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.