
शीळ पाईपलाईन दिरंगाई; कंत्राटदारावर होणार दंडात्मक कारवाई
रत्नागिरी:- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातून जॅकवेलपर्यंत पाईप जोडणी करण्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीने १३ मेपर्यंत काम पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु कामात दिरंगाई व हलगर्जीपणा दाखवला गेला म्हणून या सदर ठेकेदार कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे रत्नागिरी नगर परिषदेने ठरवले आहे.
प्रशासकीय सूत्रांनी सांगितले की, सदर ठेकेदार कंपनीला १४ मार्चला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. यात शीळ धरणापासून जॅकवेलपर्यंतची पाईप जोडणी पूर्ण करण्याचे काम समाविष्ठ होते. हे काम १३ मेपर्यंत पूर्ण करावे, असे सूचित करण्यात आले होते. परंतु हे काम वेळेत पूर्ण केले नाही. कामात दिरंगाई झाली. हलगर्जीपणा दाखवला गेला, असा आरोप ठेऊन सदर ठेकेदार कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे ठरवण्यात आले आहे. धरणापासून जॅकवेलपर्यंतचे पाईप ऐन पावसाळ्यात बसवल्याने ते निसटून गेले आणि नदीच्या दुसऱ्या काठापर्यंतचे त्यातले काही भाग गेले. ते एकत्र करुन पुन्हा बसवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. यामध्ये नगर परिषद एकही रुपया खर्च करणार नाही. पावसाळ्यानंतर हे काम कंत्राटदार सुरु करेल आणि महिनाभरात ते पूर्ण होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
शीळ धरणापासून जॅकवेलकडे जाणाऱ्या पाईप जोडणीपैकी १९८ मिटर पाईप धरणाखाली आहे. यापैकी १०० मिटर पाईप निसटून वाहिले. यानंतर मातीखाली २६२ मिटर एवढे पाईपचे काम आहे. त्यापैकी २५० मिटर काम पूर्ण झाले. बाकीचे अपूर्ण आहे. कंत्राटदारांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले. काम विहित मुदतीत पूर्ण केले नाही, कामात दिरंगाई झाली. हलगर्जीपणा दाखवला गेला म्हणून आतापर्यंत देण्यात आलेल्या कामापैकी एकही रुपया नगर परिषदेने कंत्राटदाराला दिलेला नाही. काम पूर्ण झाल्याशिवाय रक्कम देण्यात येणार नाही. या हलगर्जीपणामुळे दंडात्मक कारवाईला ठेकेदाराला तोंड द्यावे लागेल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखवल्याने धरणापासून जॅकवेलपर्यंत पाईपजोडणी पूर्ण न केल्याने फ्लोटींग पंपाच्या आधारे पाणीपुरवठा सुरु आहे. तो पाईप जोडणीपर्यंत तसाच सुरु राहील, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.