
नवनिर्माण हायमध्ये पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन
रत्नागिरी : येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पर्यावरणपूरक आठवडा साजरा करण्यात आला. यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात विद्यार्थ्यांना पर्यावरणाप्रती सजग करत त्याविषयी संवेदनशीलता आणि सध्याच्या पर्यावरणविषयक समस्या यांची माहिती देऊन त्यांना संबोधित करण्यासाठी योग्य दृष्टीकोन मिळावा याहेतूने शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला होता. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळी प्रतिकारशक्ती’ ही शासनाची थीम अंमलात आणत शाळेतल्या मुलांची फेरी काढण्यात आली. यात मुलांनी पर्यावरणाचे महत्त्व विषद करणारी विविध घोषवाक्य लिहिली. दुसऱ्या दिवशी शाश्वत अन्न प्रणालींचा अवलंब करण्याचे महत्त्व शिक्षकांनी सांगितले. तिसऱ्या दिवशी ई-कचरा आणि कचऱ्याची समस्या पर्यावरणाला कशी घातक आहे याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील सर्व कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली. पाचव्या दिवशी ऊर्जा वाचवा, सहाव्या दिवशी पाणी वाचवा, तर सातव्या दिवशी एकेरी वापराच्या प्लास्टिकला नाही म्हणा असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर झालेल्या या उपक्रमांसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.