
तब्बल ९ वर्षानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी :सन २०१५ साली पावस – पुनस रस्त्यावर झालेल्या अपघातातील आरोपीला तब्बल ९ वर्षांनंतर न्याय मिळवुन देण्याचे काम लोक अभिरक्षक कार्यालयांच्या वकिलांनी केलेले आहे.
जानेवारी २०१५ मध्ये पावस पुनस रस्त्यावर पावस कडुन सापुचेतळे जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास समोरून येणाऱ्या मॅक्झीमो गाडीने जोराची धडक देवुन अपघात केला होता. सदर अपघातात, कारच्या धडकेने आरोपी दत्ताराम सिताराम नारकर हा मोटारसायकल स्वार गंभीर जखमी होवुन जागीच बेशुध्द पडला होता. या घटनेमध्ये गंभीर जखमी बेशुध्द मोटारसायकल स्वारावरच पुर्णगड सागरी पोलीस ठाणे येथे IPC २७९, ३३७, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सन २०१५ पासुन दत्ताराम सिताराम नारकर हा न्यायालयात केसच्या सुनावणीसाठी हजर राहत होता. आर्थिक विवंचनेमुळे खाजगी वकिलांची फी देणे परवडत नसल्याने नोव्हेंबर २०२३ मध्ये आरोपीने लोक अभिरक्षक कार्यालयाकडे मोफत विधी सेवा मिळणेसाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत सहाय्यक लोक अभिरक्षक अँड यतिन अ. धुरत यांची सदर केस कामी वकिल म्हणुन नियुक्ती झाली होती. त्यांनी केसच्या कामी केलेला युक्तीवाद व त्यांनी आरोपीची कोर्टासमोर परिणामकारकरित्या मांडलेली बाजू यावर अवलंबुन आरोपी दत्ताराम नारकर याची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश कोर्टाने पारीत केला.
रत्नागिरी जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाची सुरूवात मार्च २०२३ पासुन झालेली आहे. मा. निखील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यालयाचे काम चालु आहे. ज्या आरोपींना कोणत्याही कारणास्तव खाजगी वकिल देणे शक्य होत नाही अशा आरोपींची बाजु परिणामकारकरित्या कोर्टासमोर मांडण्याचे कार्य लोक अभिरक्षक कार्यालयाचे ॲड अजित वायकुळ, ॲड. उन्मेश मुळये, ॲड. आयुधा देसाई, ॲड. पल्लवी धोत्रे, ॲड. यतिन धुरत, ॲड. गौरव भाटकर हे करत आहेत.