
जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी ७७७ अर्ज
रत्नागिरी : शिक्षण हक्क कायदाअंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातील ८१२ जागांसाठी ७७७ अर्ज दाखल झाले आहेत, मंगळवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. यामुळे सध्यातरी रिक्त जागांपेक्षा कमी अर्ज दाखल झाले.
शिक्षण हक्क कायदाअंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी चार दिवसांची मुदतवाढ मिळाली होती. मंगळवार, दि. ४ जूनपर्यंत आरटीई प्रवेशासाठी पालकांना नोंदणी करता येणार होती. आरटीई प्रवेशासाठी नवीन नियमांना स्थगिती दिल्यानंतर दि. १७ ते ३१ मे दरम्यान प्रवेशासाठी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. या तेरा दिवसांत जवळपास ९४३ पालकांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. त्यातील आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील ९६ शाळांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. एकूण ९६७ अर्ज दाखल झाले होते. त्यातील १९० अर्ज अवैध ठरले असून ७७७ अर्ज वैध ठरले आहेत.
प्रवेशासाठी नोंदणी करण्यास कमी वेळ मिळाल्याने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालकांतून होत असल्याने शालेय शिक्षण विभागाने चार दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्याचा फायदा हजारो विद्यार्थी होणार होता. या मुदतीत जिल्ह्यात मात्र कमीच प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शासनाने आरटीई प्रवेशासाठी अनुदानित, सरकारी शाळांना प्राधान्य दिले होते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरविली होती. जिल्ह्यात १२५ अर्ज दाखल झाले होते. मात्र, न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिल्याने पुन्हा जुन्या प्रक्रियेला पालकांतून चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे.