
विरोधकांना माझ्या कोकणातील जनतेने या निकालातून चोख उत्तर दिले
नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया
रत्नागिरी– सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी काम करत राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, इथला पाण्याचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. भाजपाच्या विरोधकांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. ठाकरे गटाच्या ज्या खासदाराने गेल्या दहा वर्षात एकही काम केले नाही, त्या खासदाराला जनतेने जागा दाखवत घरी बसवले आहे.
भाजपच्या विरोधकांनी माझा पराभव होणार, तसेच टीका करत विरोधी नेत्यांनी अपप्रचार केला. त्यांनाही माझ्या कोकणातील जनतेने चोख उत्तर या निकालातून दिल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत विजयानंतर ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी माजी आमदार बाळ माने, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संदीप कुडाळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा आणि आमच्या नेत्यांवर वैचारिक पातळी सोडून टीका करीत होते. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या मतदारसंघात येवून केला. गेल्या १० वर्षात खासदाराने रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या विकासात काय योगदान दिले?रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व्यवस्था यावर काय केलं?यावर न बोलता फक्त मोदी, शहा, फडणवीस आणि राणेंवर टीका करत मते मागायची, त्याला मतदारांनी योग्य धडा शिकवला असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले.
मी जिंकलो त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील भाजपा व महायुतीच्या पदाधिकारी मेहनत घेतली. त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे.या निवडणुकीत निलेश आणि नितेश यांनी ही मेहनत घेतली,त्यामुळे हा विजय आहे, मी सर्वांचे आभार मानतो. मी सर्वांचा ऋणी आहे,दिवस रात्र कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले,त्याबद्दल समाधान आणि आनंद आहे.मला जनतेने निवडून दिले आहे,त्यांचा विश्वास सार्थकी लावेन,असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील प्रस्तावित रोजगार निर्माण करणारा रिफायनरी प्रकल्प मार्गी लावला जाईल. तोडपाणीसाठी विरोध करणाऱ्यांचा विरोध मी जुमानत नाही. पुढील काळात हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. तोडपाणी करणाऱ्यांची तोडपाणी आता बंद होईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठे उद्योग यावेत, यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत, त्यातून इथल्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर प्रेम केलेले आहे.त्यांनी उपकार केलेले आहेत, मी ते कदापि विसरू शकत नाही, मी त्यांचा ऋणी आहे, ३९ वर्षानंतर कमळ फुललेले आहे,त्याचा आम्हाला आनंद आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मला उमेदवारी दिली, त्यांना मी धन्यवाद देतो.माझा विजय हा दोन्ही जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेहनतीमुळे झाला आहे. सर्वांनी केलेली मेहनत मला विजयाकडे घेवून गेली विरोधी पक्षाचे आमदार आहेत तिथे मला चांगले मताधिक्य मिळाले,हेच तर माझं नाविन्य आहे. त्यामुळेच माझा विजय झालेला असल्याचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी सांगितले.