
ट्रान्सफॉर्मर जळाल्यास आता तत्काळ मिळणार नवा ट्रान्सफॉर्मर
रत्नागिरी :ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे.
पण ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती 18002123435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी व मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला तर विद्युत पुरवठा खंडीत होउन गावकर्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालवले आहेत.
त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरु होण्यास विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे.
यावर मात करण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणला मदत करावी,असे आवाहन करण्यात येत आहे. महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच विज ग्राहकांना स्थानिक मंडल स्तरावरील संबंधित कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना त्यांच्या क्रमांकावर माहिती देता येईल. त्यासोबत व्हॉट्सअॅप नंबरवर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटा आणि ठिकाणाचा तपशिल कळवता येईल. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवून लवकरात लवकर वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्याच्या महावितरणच्या मोहिमेस विज ग्राहकांनी सहकार्य करावे आणि ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची खबर द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.