
बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
राजापूर: तालुक्यातील पन्हाळे, गुंजवणे, तळगांव, मोसम, कोंड्ये परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून अनेक पाळीव जनावरे बिबट्याची शिकार झाली आहेत. याबाबत वनविभागाकडे तकार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या विरोधात आता रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनाबाबतचे निवेदन वनविभागासह महसुल विभाग व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक दिनेश जैतापकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, उपतालुका प्रमुख रामचंद्र सरवणकर, नरेश दुधवडकर, पांड्या काझी आदी उपस्थित होते. तालुक्यातील पन्हाळे, गुंजवणे, तळगांव, मोसम, कोंड्ये गावांमध्ये मागील सहा महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. या पंचक्रोशी गावात शेळ्या, बकरे, गाई-बैल, कुत्रे, मांजर इत्यादी पाळीव जनावरांवर बिबट्या दिवसा ढवळ्या रस्त्यावर हल्ला करुन त्यांना मारत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाज झाला आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी राजापूर वन निरिक्षक अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केली आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी वेळोवेळी मागणी केली, मात्र पिंजरा न लावता किंवा इतर कोणतीही उपाय-योजना न करता राजापूर वनविभाग टाळाटाळ करत आहेत. लोकांच्या जास्त आग्रहास्तव ते दोन दिवस कॅमेरे लावतात, मात्र तो कॅमेरा चालू आहे का बंद आहे ते त्यांनाच माहित, अशी शंकाही ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे उपस्थित केली आहे.
पाळीव जनावरांवर हल्ला करणाऱया बिबट्याने जर का माणसावर हल्ला केला तर त्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे तात्काळ या निवेदनाची दखल घेवून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ दि.28 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडतील असा इशारा ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.