
घरात गणपती असताना दिवसरात्र मेहनत करून शहराला पाणी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून सत्कार
पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळेच शहराला लवकरात लवकर पाणी देणे शक्य झाले : मुख्याधिकारी तुषार बाबर
रत्नागिरी : जॅक वेल पडल्याची बातमी म्हणजे हार्ट अॅटॅक आल्यासारखी होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे शहराला लवकरात लवकर पाणी देणे शक्य झाले. माझा अंदाज होता कि आपण शहराला १५ दिवसात पाणी देऊ मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या १२ दिवसात शहरातील पाणी व्यवस्था सुरळीत केली. कोरोनाच्या कालावधीत स्वतःचे व्यवसाय बंद असताना देखील रातागिरीतील व्यापाऱ्यांनी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या माध्यमातून समाजासाठी काम केले. आज व्यापाऱ्यांच्या याच संघटनेच्या माध्यमातून माझ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होतंय याचा मला आनंद आहे असे उद्गार रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी काढले. पाणी विभागातील कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली आणि ऐन गणपतीत नागरिकांसमोर पाणी संकट उभे राहिले. घरात गणपती असताना देखील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करत 48 तासात शहराला पाणी दिले. त्यांच्या या कार्याची रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने दखल घेत या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा नगरपालिकेत आयोजित करण्यात आला होता. पाणी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यापारी महासंघाकडून नवीन कपडे शिवण्यात आले व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगरसेवक निमेश नायर, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, तालुकाध्यक्ष निखील देसाई, नगरपालिका अधिकारी भोईर, माने व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भर पावसात भिजत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल आज रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने घेतली आहे त्यांचे देखील मी आभार मानतो असे माजी नगरसेवक निमेश नायर यावेळी म्हणाले.
