
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीने लोकांचा पैसा आणि वेळ वाचतो : निखिल ग. गोसावी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
रत्नागिरी : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्याने लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो असे मत सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी निखिल ग. गोसावी यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण रत्नागिरी जिल्हामध्ये दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी निखिल ग. गोसावी यांनी दिली आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, १३८ एन. आय. अॅक्ट खालील प्रकरणे, दिवाणी दावे व अपिले, ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयातील प्रकरणे, नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपटटी बिलाच्या देयाकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमीटेड, महावितरण, सर्व बॅंका आणि पतसंस्था व इतर यांचेकडील थकबाकीबाबतची प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्याने लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेली कोर्ट फि परत मिळते. त्यामूळे दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी होणा-या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांनी केले आहे.