
राजापूरातील अणसुरे भराडेवाडी येथे बिबट्याची दहशत
राजापूर:- तालुक्यातील अणसुरे भराडेवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असल्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
दोनच दिवसांपूर्वी भराडे वाडीतील सोमकांत धोंडू नाचणेकर यांचा एक बैल चरायला सोडला तो संध्याकाळपर्यंत घरी आला नाही म्हणून सर्वत्र शोध घेतला तरी सापडला नाही. दुसऱ्या दिवशी वाडीतील निलेश कामतेकर हा तरुण काजू काढण्यासाठी घोलाच्या जंगलात गेला असता समोरचं दृश्य बघून त्याची पाचावर धारण बसली. त्याच्यापासून सुमारे पन्नास फुटावर बिबट्या बैलाला ओढत आणताना दिसला.
नीलेश माघारी पळत सुटला आणि सोमकांत यांच्या घरी जाऊन याची माहिती दिली. त्यानंतर गावातील आठ- दहा लोक त्या जंगलात गेले . त्या ठिकाणी बैल अर्ध्या खाल्लेल्या स्थितीत आढळून आला. ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण गावकर यांना फोन केला असता त्यांनी ताबडतोब वनाधिकऱ्यांना कळविले व स्वतः तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. गेल्या अनेक दिवसांपासून आजूबाजूच्या गावातील अनेक कुत्र्यांचा फडशा सांगितले जात आहे. परिसरातील गावातील लोकांनी सावध रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
तसेच या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने आणि वनाधिकारी यांनी उपाययोजना करावी ही मागणी देखील करण्यात आली आहे.