
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार मोहीम गतिमान
रत्नागिरी:उन्हाळ्यात भेेडसावणारी पाणीटंचाई कमी करण्यासाठी आणि जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने जलयुक्त शिवार मोहीम गतिमान करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यातील धनगरवाड्यांवर पाणी अडवा पाणी जिरवा, यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती, वनविभाग, उपअभियंता बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, तालुका कृषी विभागाने टँकरमुक्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या उपक्रमात धनगरवाड्यांवर क्षेत्रीय भेटी देऊन ठिकाण निश्चित करण्यात येत आहे. ग्रामस्थांचा यामध्ये सहभाग घेतला जात आहे. यामध्ये शेतीसाठी पाणी उपयोगी पडेल, असे प्रक्षेत्र निवडले जात आहे. यामध्ये सीसीटी, समतल चर, शेततळी, वनतळी, नालाबांध, सिमेंट बांध, माती बांध, लुज बोल्डर यासह टॉप टू बॉटमची कामे केली जाणार आहेत. निवडलेल्या गावात ग्रामस्थांशी संवाद साधून प्रबोधन केले जाणार आहे.
प्रत्येक विभागातील अधिकार्यांनी आपआपल्या विभागांतर्गत मोहिमेकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निवडलेल्या गावात पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून पाणलोट तयार करून जमिनीत पाणी मुरवून भूजल पातळी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.